महाविद्यालयातील विद्यार्थी करत होते तस्करी
नाशिकच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडे बिबट्याची कातडी, चिंकाराचे आणि निलगायीचे शिंगे असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी वन विभागाला मिळाली होती. वनविभागाला मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे वन परिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे आणि कर्मचाऱ्यांनी बनावट ग्राहक तयार करून संशयितांशी संपर्क साधला. सुरवातीला वन्यप्राण्यांच्या अवयवांची किमत २० लाख रुपये सांगण्यात आले होते. मात्र तडजोड करत ४ लाख रुपये देण्याचे ठरले.
मंगळवारी (२० सप्टेंबर) शहरातील उच्चभ्रू समाजल्या जाणाऱ्या कृषी नगर जॉगिंग ट्रॅक जवळ तीन संशयित आरोपींना अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. अखेर संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास तीन तरुणांना वन्यजीवांच्या अवयवांसह रंगेहात अटक केली आहे. संशयित आरोपींची चौकशी केली असता ते नाशिकमध्ये महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याच उघड झाल आहे. तीन साथीदार असल्याचा संशय वन विभागाने व्यक्त केला आहे.
कोण आहेत हे तीन तरुण
वन विभागाने अटक केलेले तीनहि संशयित नाशिक शहरातील आहेत. यातील दोन तरुण महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. एक तरुण बी. फार्मसी, तर दुसरा बी. एस. सी. करत आहे. तर तिसऱ्या तरुणाचा नाशिक शहरात खाजगी व्यवसाय आहे.
जिल्ह्यातील तिसरी घटना
नाशिक जिल्ह्यातील १५ दिवसांतील ही तिसरी कारवाई आहे. यापूर्वी इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात सुद्धा कारवाई करण्यात आली होती. यातही बिबट्याच्या कातडी मिळून आली होती. ग्रामीण भागातील वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणारी टोळी आता शहरातही सक्रीय होत असल्याच या घटनेमुळे समोर आल आहे.
नाशिक जिल्हायात बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच राजापूर भागात हरीण काळवीट अभयारण्यात संख्या अधिकच झाली आहे. परिणामी गेल्या सहा महिन्यात वन्य जीवांची आणि त्यांच्या अवयव विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे अनेक घटनांत समोर आले आहे. अंधश्रद्धेच्या बाजारात अशा वस्तुंना मागणी वाढल्याने नाशिक मधील काही प्रतिष्टीत यामागे असल्याचे बोलले जात आहे.
