गणेशला जन्मापासुन दोन्ही हातच नाही. तरी त्यांची जगण्यासोबतची लढाई काही कमी झालेली नाही. त्याला हात नसतांना देखील त्याने वयाच्या अवघ्या आठ वर्षात आपल्या अंपगत्वावार मात करत शिक्षणासाठी घेतलेली भरारी भल्या भल्यांना थक्क करून सोडणारी आहे.
काही कौटुंबिक कारणास्तव लहानग्या वयात आई घर सोडून गेल्याने गणेशच्या पालन पोषणाची जबाबदारी त्याचे वडीलच सांभाळत आहे. सकाळी ४ वाजता उठुन त्याचे वडील त्याच्या नित्यचर्येसाठी त्याला मदत करतात. त्यानंतर तयार होऊन गणेश जिद्दीने शाळा गाठतो.
हात नसल्याने गणेश हा पायानेच अक्षर गिरवतो. याशिवाय पायानेच मोबाईलवर गेमदेखील खेळतो. जेवणाचा म्हणाल, तर मग याच पायाच्या सहाय्याने त्याला खातांना पाहिल्यास त्याच्या संघर्षाची अनुभुती सर्वांनाच होईल. गणेशला त्याच्या वर्गातील मित्रही दिनचर्येसाठी मदत करतात.
या कोवळ्या वयातही त्यांची शिक्षण आणि खेळातील अभिरुचीला त्यांच अपंगत्व थांबवू शकलेले नाही. शिक्षणासोबत खेळातील त्यांची आवड आणि मैदानातील त्याची चपळता भल्या भल्यांना आवाक् करणारी आहे. पण घराच्या अठरा विश्व दारीद्र्यात तो आणखीन किती तग धरणार हा प्रश्न त्याच्या शिक्षकांसह , गावातील त्यांच्या शुभचिंतकांनाही भेडसावत आहे.
वडील मोल मजुरी करून कसाबसा कुटुंबाचा गुजारा करत असल्याने आजी आजोबांच्या देखरेखीखाली राहणाऱ्या गणेशला शासन स्तरावरुनच कृत्रिम अवयवांसाठी मदत मिळावी अशी अपेक्षा त्याचे जवळचे मंडळी करत आहे.
चिमुकल्या वयात मायेची ममता मुकलेल्या या गणेशला आता आपल्या मदतीची प्रतिक्षा आहे. त्यामुळे सरकारने पुढे येऊन त्याच्यासाठी कृत्रिम अवयवांचा बंदोबस्त करुन दिल्यास आणि त्याला शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ दिल्यास गणेश हा आगामी काळात इतरांसांठी प्रेरणादायीच ठरेल.
