मालेगाव हादरले! शेतात गेलेल्या महिलेला निर्घृणपणे संपवलं; शीर, धड, पाय वेगवेगळ्या ठिकाणी आढळले

फुले शाहू आंबेडकर
0
मालेगाव : तालुक्यातील दहीदी येथील शेतकरी महिलेचा अतिशय क्रूरपणे खून केल्याची घटना मंगळवारी ( दि.३१) समोर आली. सुमनबाई भास्कर बिचकुले (वय ३५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. शेताजवळील जंगलात त्यांच्या शरीराचे तुकडे करून फेकून देण्यात आले होते. तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे घटना?

दहीदी गावाजवळ बिचकुले यांची शेती आहे. शेतात त्यांचे राहते घर असून, सोमवारी (दि.३०) सकाळी सूमनबाई मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. तर त्यांचे पती भास्कर हे शेतमाल विक्रीसाठी बाहेरगावी गेले होते. सायंकाळी भास्कर घरी आल्यावर पत्नी घरी नसल्याने ते शेतात पाहण्यासाठी गेले. तेथे त्या नसल्याने त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना बोलावून शोध सुरू केला. शेतात रक्ताने माखलेले फावडे आढळले आणि शेतापासून एक किमी अंतरावरील जंगलात सुमनबाई यांचे शीर, धड, पाय वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. अतिशय क्रूरपणे त्यांच्या खून करण्यात आल्याने परिसरातील नागरिक हादरले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस श्वानपथकासह दाखल झाले होते. रात्री उशिरा मृतदेह मालेगावी आणण्यात आला. मंगळवारी शोकाकुल वातावरणात त्यांचा अंत्यविधी पार पडला. सुमनबाई यांच्या पश्चात पती, सासू, सासरे, तीन मुली, दोन मुलगे असा परिवार आहे.
नराधम कोण?

भास्कर बिचकुले शेती करतात. ते चार भावंड असून गावात आणि शेतात त्यांचे घर आहे. शेतातील घरी भास्कर व त्यांच्या पत्नीच राहतात. सोमवारीदेखील ते दोघेच शेतावर होते. पंचक्रोशीत या अमानवी घटनेने नागरिक हादरले आहेत. सुमनबाई यांची पाचही मुले आईच्या मायेला पारखी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमागील नराधम कोण आहे? याचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी दहीदीकरांनी केली आहे.
पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हेगारांचा शोध सुरू आहे. - अनिकेत भारती, अपर पोलिस अधीक्षक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default