बंजारा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. जानेवारीमध्ये विश्वजित राठोड या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने तापी नदीत उडी टाकून आत्महत्या केली.उसनवार घेतलेले पैसे, त्यावरील व्याज आणि व्याजावरील चक्रवाढ व्याज अशा पद्धतीने मोठी रक्कम वसूल करण्यासाठी वारंवार दबाव टाकण्यात आल्याने मानसिक ताण असह्य होऊन त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.याबाबत थाळनेर पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाला गुन्हेगारीसह नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना सावकारी पाशात अडकविले जात असल्याचा संदर्भदेखील आहे. त्या दृष्टीने या गुन्ह्याचा तपास करावा व संशयितांना तातडीने अटक करावी
विद्यार्थ्यांच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना वाढदिवस साजरे करणे, सहलीस जाणे किंवा अन्य कारणांमुळे त्यांना उधारीने पैसे द्यायचे, त्यावर ४० ते ४५ टक्के इतक्या प्रचंड दराने व्याज आकारायचे व या व्याजावरही चक्रवाढ व्याज लावायचे अशा पद्धतीने उधार दिलेल्या काही हजार रुपयांपोटी लाखो रुपये वसूल केले जातात. विद्यार्थ्यांना आपल्या पाशात अडकविणारी टोळी शिरपुरात कार्यरत असल्याचे वारंवार दिसून येते. अनेक विद्यार्थी या टोळीच्या जाळ्यात अडकले आहेत. परस्पर व्यवहार केल्याने त्याबाबत ते घरी सांगू शकत नाहीत. परिणामी आणखी उसनवारी करून कर्जफेड करणे किंवा नाइलाजाने अवैध मार्ग अवलंबून पैशांची सोय करणे हेच उपाय त्यांच्याकडे शिल्लक राहतात. त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन त्यांना गुन्हेगारी विश्वात ढकलण्याचेही प्रकार घडतात. विश्वजित राठोड यांच्या मृत्यूनंतर हा गैरप्रकार प्रामुख्याने ऐरणीवर आला आहे. अनेक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्याला दुजोराही दिला. विश्वजित राठोडसारखा प्रसंग कोणत्याही विद्यार्थ्यावर किंवा त्यांच्या पालकांवर ओढवू नये यासाठी संबंधित तपास अधिकाऱ्यांना सखोल चौकशी करून अवैध सावकारी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा होईल, अशी पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
