खंबाळे (ता.शिरपुर) येथील रहिवाशी असलेल्या तक्रारदाराच्या वडीलांच्या नावे खंबाळे येथे शेत जमीन आहे.वडील सन 2017 मध्ये मयत झाले असुन त्यांच्या नावावर असलेल्या शेत जमिनीस काही कारणास्तव वारस लावण्याचे राहुन गेले होते. त्यामुळे शेतजमिनीच्या 7/12 उतार्यावर वारस लावण्याकरीता तक्रारदाराने खंबाळे येथील तलाठी सुर्या पायल्या कोकणी यांची भेट घेतली. तेव्हा तलाठी कोकणी यांनी वारस लावण्याच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज व त्यासोबत 7 हजार रुपये घेवुन ये, असे सांगितले.
त्यामुळे तक्रारदाराने धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दुरध्वनीद्वारे तक्रार दिली होती. त्यानुसार एसीबीच्या पथकाने शिरपुर येथे दि. 18 जानेवारी रोजी जावुन तक्रारदाराची भेट घेवुन तक्रार नोंदवुन घेतली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता तलाठी कोकणी यांनी मोहीदा या गावात तक्रारदाराकडे साक्षीदाराचे समक्ष प्रथम 7 हजारांची मागणी केली.
नंतर तडजोडी अंती 6 हजार रूपयांची मागणी केली होती. परंतु तलाठी सुर्या कोकणी यांना लाच स्विकारतेवेळी संशय आल्याने लाच न स्विकारता कारमध्ये बसून मुंबई-आग्रा महामार्गाने शिरपुरच्या दिशेने निघून गेले होते. दरम्यान तलाठी कोकणी यांनी लाचेची मागणी केल्याचे कार्यवाही अंती त्यांच्या विरुध्द शिरपुर तालुका पोलिसात भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तलाठी कोकणी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे तसेच राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भुषण खलाणेकर, भूषण शेटे, गायत्री पाटील, संदीप कदम, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, रोहीणी पवार, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.
