प्रेमविवाहानंतर सिद्धार्थने मुस्लीम धर्म स्वीकारला; मृत्यूनंतर कुटुंबीयांनी नाकारलं, अखेर रुकसानाने दिला मुखाग्नी

फुले शाहू आंबेडकर
0
धुळ्यात हृदय पिळवटून टाकणारी एक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेच्या पतीचे निधन झाले. त्यावेळी पतीच्या कुटुंबियांना याची माहिती दिल्यावर त्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे दोन दिवस उलटूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले नाहीत. शेवटी महिलेने स्वत: काळजावर दगड ठेवून आपल्या पतीला मुखाग्नी दिला.
चाळीसगाव येथून पतीच्या उपचारासाठी रुकसाना धुळ्यात आली होती. इथे आल्यावर पती युसुफ पठाणला धुळ्यातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले. ८ दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मुस्लिम मुलीशी विवाह केल्यानं कुटुंबियांनी नाकारलं

पतीच्या निधनानंतर पत्नी रुकसानावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, कारण एकेकाळचा हिंदू असलेला सिद्धार्थ गोडबोले हा रुकसानासोबत प्रेमविवाह केल्यानंतर युसूफ पठाण झाला होता. सिद्धार्थने रुकसानासाठी मुस्लीम धर्म स्वीकारला होता. त्यामुळे या दोघांच्या प्रेमविवाहानंतर दोघांचेही कुटुंबीय या दोघांपासून दुरावले होते. पतीच्या निधनानंतर पुढे काय करायचे असा प्रश्न रुकसानासमोर उभा ठाकला होता.

पतीच्या मृत्यूनंतर रुकसानाने याबाबत युसूफच्या म्हणजेच सिद्धार्थच्या कुटुंबीयांना कळवली. परंतु कुटुंबीयांनी सिद्धार्थच्या अंत्यविधीस नकार दिला. त्यानंतर रुकसानाने तिच्या समाजातील जवळच्या व्यक्तींना देखील या घटनेची माहिती दिली; परंतु तेथून देखील तिच्या पदरी नकार पडला.

दोन चिमुकल्या मुलांना सोबत घेऊन रुकसाना पतीच्या अंत्यसंस्कारासाठी मदत मागू लागली, परंतु तिच्या मदतीसाठी कुणीही समोर येत नव्हतं. त्यामुळे पतीचा मृत्यू होऊन देखील त्याचा मृतदेह दोन दिवस शासकीय रुग्णालयात पडून होता.

अखेर पतीच्या अंत्यसंस्कारासाठी धडपड करत असलेल्या रुकसानाला कुणीतरी धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते सतीश उघडे यांच्याशी संपर्क करून दिला. रुकसानाची पूर्ण विवंचना समजून घेतल्यानंतर पतीचा अंत्यविधी कशाप्रकारे करायचा असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी रुकसानाला विचारला.

रुकसानाने हिंदू रीती-रिवाजाप्रमाणे पतीच्या अंत्यविधीसाठी सकारात्मकता दाखविल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी अखेर रुकसानाच्या पतीचा मृतदेह धुळ्यातील चित्तोड रोड येथील अमरधाम येथे आणला. तसेच रुकसानाने आपल्या हाताने अग्नीडाग देऊन पतीचे अंत्यविधी पूर्ण केले. अंत्यविधीनंतर पतीच्या अस्थी देखील रुकसानाकडे देण्यात आल्या. पतीच्या निधनानंतर रुकसानाच्या खांद्यावर स्वतःसह दोन चिमुकल्यांची जबाबदारी असून या एकट्या पडलेल्या आयुष्यात चिमुकल्यांचा सांभाळ आता करायचा कसा हा प्रश्न उपस्थित राहिला आहे.

एकीकडे रक्ताच्या नात्याने अंत्यविधीसाठी नकार दिल्यानंतर जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म जोपासत धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी अंत्यविधीसाठी मदत केल्याने हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default