मागणी 40 कोटी, वसूल झाले 7 कोटी; पाणीपट्टीची स्थिती
सोमवार, एप्रिल १०, २०२३
0
शहरातील मालमत्ताधारकांकडे मालमत्ता करापोटी कोट्यवधी रुपयांची थकबाकी असताना पाणीपट्टी थकबाकीदेखील कोट्यवधी रुपयांच्या घरातच आहे. या वर्षी मार्चअखेर केवळ १८ टक्के पाणीपट्टी वसुल झाली
एकीकडे शहरवासीयांच्या पाणीपुरवठ्यावर प्रचंड खर्च होत असताना त्या मोबदल्यात मिळणारे उत्पन्न मात्र अत्यल्प आहेच पण तेही शंभर टक्के वसूल होत नाही. त्यामुळे मालमत्ता करासोबतच पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेला गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
मालमत्ता करापोटी मार्चअखेर ५८.८६ कोटींपैकी ३४.२२ कोटी रुपये वसूल झाले. चालू मागणीपोटी एकूण ६८ टक्के, तर थकबाकीसह मागणीपोटी ५८.१३ टक्के वसुलीचे हे प्रमाण आहे. मालमत्ता करापोटी कोट्यवधी रुपये बाकी असताना पाणीपट्टी थकबाकीचीही यापेक्षा वेगळी किंबहुना अधिक गंभीर स्थिती आहे.
केवळ सात कोटी वसूल
पाणीपट्टीपोटी नागरिकांकडे एकूण २९.९३ कोटी रुपये थकबाकी होती. यातील केवळ ३.६८ कोटी रुपयेच वसुली झाली. चालू मागणी १०.८९ कोटी रुपये होती, यातूनही ३.५१ कोटी रुपयेच वसुली करता आली. अर्थात एकूण ४०.८२ कोटी रुपये पाणीपट्टीपैकी एकूण केवळ ७.२० कोटी रुपये वसूल झाले.
अर्थात केवळ १८ टक्के वसुलीचे हे प्रमाण आहे. अर्थात पाणीपट्टीपोटी तब्बल ३३.६२ कोटी रुपये वसूल झाले नाहीत. शहरवासीयांच्या पाणीपुरवठ्यावर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना त्या मोबदल्यात महापालिकेला मिळणारे उत्पन्न मात्र अत्यल्प आहे. अर्थात शहरवासीयांच्या मूलभूत गरजांपैकी महत्त्वाची गरज असलेल्या पाण्यावर खर्च झाला तर त्यात वावगे नाही. पण पाणीपट्टी वसुलीतून थोडाफार का होईना याचा भार कमी होणे आवश्यक आहे.
शहरवासीयांच्या पाणीपुरवठ्यात सर्वाधिक खर्च उच्चदाब वीजबिलावर होतो. अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेद्वारे ग्रॅव्हिटीने शहरात पाणी येणार असल्याने वीजबिलावर होणारा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. असे असले तरी पाणीपट्टी वसुली हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. विशेषतः अनधिकृत नळ कनेक्शनद्वारे, मुख्य जलवाहिन्यांवरून कनेक्शन्स घेऊन २४ तास पाणी वापरणाऱ्यांना लगाम घालण्याची गरज आहे.
हद्दवाढ क्षेत्रात अवस्ताव बिले!
द्दवाढ क्षेत्रातील मालमत्ताधारकांना पाणीपट्टीपोटी दिलेल्या बिलांमध्येही मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचे सांगितले जाते. हद्दवाढ भागातील नागरिकांना पाणीपट्टीची बिलेही अव्वाच्या सव्वा वितरित झाल्याच्या तक्रारी आहेत. ज्यांनी दोन-चार महिन्यांपूर्वी नळ कनेक्शन्स घेतले त्यांनाही मागील काळातील हजारो रुपये बिल गेल्याच्या तक्रारी आहेत. महापालिकेच्या संगणीकृत प्रणालीमुळे हा घोळ झाल्याचेही समजते. हा घोळही महापालिकेला निस्तरावा लागणार आहे
Tags

