दोघेही गावचे कारभारी पण एका गोष्टीवरुन सतत संशय, घरात भांडणं, बायकोने नको ते पाऊल उचललं

फुले शाहू आंबेडकर
0

दोघेही माजी सरपंच... राजकीय आणि सामाजिक जीवनात दोघांचंही चांगलं काम.. पण पत्नीवर सतत संशय घ्यायचा स्वभाव.. नवऱ्याने कित्येक महिने तिच्या चारित्यावर संशय घेतला. या साऱ्याला ती त्रासून गेली होती. अखेर नवऱ्याच्याच वाढदिनी तिने नको ते पाऊल उचललं आणि आपल्या आयुष्याला पूर्णविराम दिला

नवऱ्याकडून सतत चारित्र्यावर संशय घेत मानसिक आणि शारिरीक त्रासाच्या जाचाला कंटाळून एका माजी सरपंच पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुप्रिया बाजीराव वाडकर (वय ३३. रा. हणबरवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या माजी सरपंच पत्नीचे नाव आहे. ही घटना काल दि. १ एप्रिल रोजी घडली आहे. विशेष म्हणजे सुप्रिया यांचा पती बाजीराव वाडकर हा देखील माजी सरपंच आहे. आरोपी बाजीराव याच्या विरोधात सुप्रिया यांचे वडिल दिलीप शामराव पाटील यांनी इस्पूर्ली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मिळालेली माहिती अशी की, माजी सरपंच बाजीराव वाडकर आणि सुप्रिया वाडकर दोघेही माजी सरपंच असल्याने दोघांचाही सामाजिक, राजकीय क्षेत्रात वावर होता. मात्र बाजीराव वाडकर यांच्याकडून २०१२ पासून सुप्रिया यांना माहेरकडून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. यासाठी त्यांच्यावर सातत्याने चारित्र्याचा संशय घेऊन मानसिक आणि शारिरीक त्रास दिला जात होता. त्यामुळे सातत्याने होणाऱ्या जाचाला सुप्रिया वैतागल्या होत्या.
दरम्यान शनिवारी १ एप्रिलला बाजीराव वाडकर याचा वाढदिवस होता. यादिवशी मुले शाळेल्या गेल्यानंतर सुप्रिया यांनी पतीला वाढदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर बाजीराव वैयक्तिक कामासाठी बाहेरगावी निघून गेले. यावेळी घरी कोणी नसल्याने सुप्रिया यांनी गळफास घेतला. कुटुंबीय घरी आल्यानंतर सुप्रियाच्या आत्महत्येचा प्रकार लक्षात आला.
त्यानंतर सुप्रियाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान याबाबतची माहिती सुप्रियाच्या माहेरी देण्यात आल्यानंतर माहेरकडील लोकांनी आम्ही रुग्णालयात पोहोचल्याशिवाय मृतदेह ताब्यात घ्यायची नाही, अशी भूमिका घेतली. नंतर मुलीचे नातेवाईक आल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. तर वडील दिलीप पाटील यांनी माजी सरपंच पती बाजीराव वाडकर यांच्या विरोधात इस्पूर्ली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सामाजिक, राजकीय क्षेत्रात वावर असलेल्या घरामध्येच अश्या पद्धतीने मानसिक व शारीरिक त्रास होत होता. सुप्रियाने अवघ्या ३३ व्या वर्षी जीवाला कंटाळून आत्महत्येसारखा टोकाचे पाऊल उचलल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात असून सुप्रियाच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default