चांदसैली घाटात पिकअप व्हॅन उलटलेचौघे ठार, दोन जखमी

फुले शाहू आंबेडकर
0
घरासाठी कौल घेण्यास जात असताना चांदसैली घाटाच्या  तीव्र उताराव  पिकअपचा वाहन  उलटल्याने चार जणांचा मृत्यू  झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
नंदुरबार जिल्ह्यातील चांदसैली घाट हा नागमोडी वळणाचा आणि तीव्र उताराचा आहे. आज दि.२३ रोजी वावी ता.धडगाव येथून घराची कौले घेण्यासाठी चांदसैली मार्गे वेलदा ता.निझर या ठिकाणी पिकअप व्हॅन जात होती. दुपारी चांदसैली घाटातील तीव्र उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप तीन वेळा पलटी होवून खोल दरीत कोसळली. या अपघातात पिकअपचा चक्काचूर झाला असून त्यातील चार जण जागीच ठार झाले आहेत तर दोेन जण गंभीर जखमी झाले आहेत
घटनास्थळी मदतकार्य सुरू असून चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तर जखमीना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. चौघा मयतांपैकी तीन जण वावी ता.धडगाव व एक जण बोधला ता.धडगाव येथील आहेत. तसेच दोन जखमी वावी येथील आहेत.

मयतांमध्ये चालक तुकाराम दिवल्या ठाकरे (वय ३५ रा.वावी), विरसिंग रमेश पावरा (वय ३५,रा.बोधला), मुकेश कैला ठाकरे (वय २५ रा.वावी), अमरसिंग शंकर ठाकरे (वय ३०, रा.वावी) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये सुरुपसिंग साकर्‍या ठाकरे (वय २०, रा.वावी), गणेश साकर्‍या ठाकरे (वय १५, रा.वावी) यांचा समावेश आहे.
मयतांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल करण्यात आले आहे.धडगाव तालुक्याला नंदुरबार जिल्ह्याशी जोडणारा आणि कमी अंतराचा मार्ग चांदसैली घाट आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या घाटातून प्रवासी वाहतूक होत असते. गेल्या दोन वर्षांपासून या घाटाची अत्यंत दूरवस्था झाली आहे.

घाटातील सात पायर्‍या भागात जागोजागी रस्ता खचलेला असून याठिकाणी नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात. यातच खराब रस्त्यांमुळे हा भीषण अपघात झाला असल्याचे म्हटले जात आहे. खचलेल्या रस्त्यांमुळे अजून किती प्रवाशांचा जीव प्रशासन घेणार आहे? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default