अंबरनाथ हादरलं! मूलबाळ होत नसल्यानं पतीचं पत्नीसोबत भयानक कृत्य

फुले शाहू आंबेडकर
0
अंबरनाथमधून एक भयानक घटना समोर आली आहे. लग्नाला १२ वर्ष होऊनही मूलबाळ होत नसल्यानं पतीनं डोक्यात अवजड वस्तू मारून पत्नीची हत्या केली आहे. अंबरनाथच्या ऑर्डनन्स इस्टेटमध्ये घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. नीतू कुमारी मंडल (वय ३०) असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव असून याप्रकरणी पोलिसांनी संशयित पतीला ताब्यात घेतलं आहे
रोनीतराज मंडल (वय ३७) असं संशयित आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या ऑर्डनन्स इस्टेटमधील एमपीएफ मैदानासमोर रोनीतराज मंडल हा पत्नी नीतू कुमारी मंडल सोबत वास्तव्याला होता. मूळच्या बिहारमधील असलेल्या या दोघांचं २०११ साली लग्न झालं होतं.
२०१६ साली रोनीतराज हा ऑर्डनन्स फॅक्टरीच्या अंबरनाथमधील मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत फिटर म्हणून कामाला लागला. ऑर्डनन्स इस्टेटमधील एच ३८ या स्टाफ क्वार्टरमध्ये हे दाम्पत्य राहायला होतं. त्यांच्या लग्नाला १२ वर्ष झाली, तरी त्यांना मूलबाळ होत नसल्यानं नीतू कुमारीची आयव्हीएफ ट्रीटमेंटही सुरू होती. 

मात्र, रोनीतराज हा याच कारणावरून तिच्या चारित्र्यावर संशय घेत नेहमी तिच्याशी वाद घालत होता. रविवारी दुपारी रोनीतराज याने मद्यपान केल्यानंतर तो जेवत असताना त्याचे पत्नीसोबत पुन्हा वाद झाले आणि त्याने पत्नीच्या डोक्यात अवजड वस्तू मारून तिची हत्या केली.
यानंतर संध्याकाळच्या सुमारास त्याने शेजाऱ्यांना बोलावत आपल्या पत्नीची कुणीतरी हत्या केल्याचं सांगितलं आणि आपल्याला काहीच माहिती नसल्याचा बनाव रचला. या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. मात्र रोनीतराज सांगत असलेल्या गोष्टीवर संशय आल्यानं पोलिसांनी त्यालाच ताब्यात घेत चौकशी सुरू केली.

या हत्येप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून मृत नीतू कुमारी हिचा पती रोनीतराज यालाच संशयित म्हणून ताब्यात घेतल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दिली आहे. मात्र केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या व्यक्तीनं केलेल्या या गुन्ह्यामुळे शहरात मोठी खळबळ माजली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default