नाशिक जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोवंश तस्करीच्या संशयावरून राष्ट्रीय बजरंग दलाच्या जिल्हाध्यक्षासह 15 ते 16 जणांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
लुकमान अन्सारी असे या तरुणाचे नाव असून या मारहाणीत आणखी एक जखमी झाला आहे. याप्रकरणी राष्ट्रीय बजरंग दलाचा जिल्हाध्यक्ष पप्पू आडोळे याच्यासह 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, ८ जून रोजी जीपमध्ये गोवंश असल्याच्या संशयातून एक गाडीकसारा या ठिकाणी जमावाने अडवली होती. यानंतर ती गाडी आणि त्यामधील तरुणांना आणि ईगतपुरी इथे आणण्यात आले. यावेळी मुंबई महामार्गावर जीपमधील तीन जण आणि 15 ते 16 जणांमध्ये आर्थिक कारणावरून बाचाबाची झाली.
यावेळी झालेल्या जबर मारहाणीत लुकमान अन्सारी मृत्यू झाला. ही घटना 8 जून रोजी घडली पण 10 रोजी लुकमानचा मृतदेह सापडल्यावर ही घटना उजेडात आली. धक्कादायक बाब म्हणजे घटनेच्या दिवशी अन्य जखमींना मारेकऱ्यांनी पोलीस स्टेशनला आणले होते, परंतु पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला
यावेळी पोलिसांनी या घटनेची फारशी दखल घेतली नव्हती. अखेर हा प्रकार मॉब लिचिंगचा प्रकार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आणि मृताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांपैकी पप्पू आडोळे हा राष्ट्रीय बजरंग दलाचा जिल्हा अध्यक्ष आहे. मात्र त्याचा बजरंग दलाशी संबंध नसल्याचे बजरंग दलाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
