वंचितचा इंडिया आघाडीत समावेश होण्याचा मुद्दा रेंगाळला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी ‘एनडीए’ची दारे सदैव उघडी आहेत. ते ‘एनडीए’मध्ये सहभागी झाल्यास आनंदच असून त्यांना माझे मंत्रिपद देण्यास तयार आहे, अशी थेट ऑफरच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. ‘एनडीए’मध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण त्यांनी ॲड.आंबेडकर यांना दिले.
अकोल्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, ‘‘राज्यात गटातटात विभागलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घेतला पाहिजे. ऐक्याचा चेंडू प्रकाश आंबेडकर यांच्या कोर्टात आहे. आरपीआय एकत्रित यावा, ही माझी पूर्वीच भूमिका राहिली. मात्र, तीन आंबेडकर बंधूच वेगवेगळे राजकारण करीत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाचे नाव सुद्धा बदलले. सर्वप्रथम त्यांनी एकत्रित येण्याची गरज आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करण्याची तयारी असून ते एनडीएमध्ये सहभागी झाल्यास त्यांना माझे मंत्रिपद देखील देईल.’’
ग्रामीण भागातील भूमिहीन नागरिकांना पाच एकर जमीन मिळावी, यासाठी राज्य शासनाने समिती नेमण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. भूदान चळवळीप्रमाणे पुन्हा एकदा मोहीम राबवली जाऊ शकते का? या दृष्टीने देखील प्रयत्न राहतील. विदर्भाला न्याय मिळावा, ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका राहिली आहे. आगामी काळात विदर्भात पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न केले जातील, असे रामदास आठवले म्हणाले.
राज्यात महायुती ४८ पैकी ४५ जागा जिंकेल. आरपीआयला किमान दोन लोकसभेच्या जागा मिळण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांची भेट घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक स्तरावरील लोकप्रिय नेते असून निवडणुकीमध्ये एनडीए आघाडीला ४०० पेक्षा अधिक जागा मिळेल, असा दावा देखील रामदास आठवलेंनी केला. संविधानाला अनुरूप कार्य मोदी सरकारने केले असून काँग्रेसने फक्त दलितांचे मते घेण्याचे काम केले, अशी टीका देखील त्यांनी केली. राहुल गांधींना जोडीदाराची गरज असून त्यांनी दलित मुलीशी लग्न करावे, याचा पुनरुच्चार रामदास आठवले यांनी केला.
तामिळनाडू पॅटर्न’नुसार आरक्षणाचा प्रश्न सुटेल
तामिळनाडूमध्ये ६९ टक्के आरक्षण असून तो पॅटर्न महाराष्ट्रात लागू झाल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकेल. जातीनिहाय जनगणनेला तांत्रिक अडचण असली तरी ती झाल्यास प्रत्येक जातीची टक्केवारी कळेल. त्यानुसार आरक्षणात वाटा देता येईल, असे देखील रामदास आठवले म्हणाले.
आम्ही राहिलो अन् अजित पवारांना मिळाले’
