पत्नीच्या पाचव्या लग्नामुळे उद्भवलेल्या वादातून पतीनं गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. गेल्या आठवड्यात इंदूरमध्ये पत्नीसोबत झालेल्या वादानंतर स्वत:ला पेटवून घेतलेल्या 35 वर्षीय व्यक्तीचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पाचव्या लग्नावरुन आपल्या पत्नीशी वाद झाला आणि त्यामुळेच त्यानं हे पाऊल उचललं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती महिलेचा चौथा पती होता, खरंच पतीच्या आत्महत्येचं कारण महिलेचं पाचवं लग्न होतं का? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
पोलीस अधिकारी शैलेंद्र सिंह जादोने यांनी सांगितलं की, "मृत सुनील लोहानी महिलेचा चौथा पती होता, ज्याच्याशी महिलेनं 2018 मध्ये लग्नगाठ बांधली होती. दरम्यान, लग्नाच्या काही दिवसांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. महिलेनं पतीचं घर सोडून आपल्या आई-वडिलांचं घर गाठलं आणि तिथेच राहू लागली."
महिलेनं मृत पतीविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा महिलेनं पोलिसांत दाखल केला होता. कदाचित याच न्यायालयीन खटल्याला कंटाळून महिलेच्या पतीनं टोकाचं पाऊल उचललं असू शकतो, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, लोहानी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःचा एक व्हिडीओ शूट केला होता आणि तो सुसाईड नोटसह सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यात त्याच्या पत्नीनं पाचव्यांदा लग्न केल्यामुळे तो नाराज असल्याचं म्हटलं होतं.
महिलेच्या पाचव्या लग्न झाल्याचं पोलिसांनीही सांगितलं आहे. पत्नीनं पाचव्यांदा लग्नगाठ बांधल्यामुळे इंदूरमधील जुनी परिसरात लोहानी यांनी स्वतःवर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतल्याची घटना जवळच्या घरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
