30 वर्षांपासून दखलपात्र प्रकल्पाची प्रतीक्षा; धुळे-नरडाणा, मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग अधांतरीच

फुले शाहू आंबेडकर
0
गेल्या पंचवीस तीस वर्षात दृष्टीक्षेपात पडावा असा एकही केंद्र स्तरावरील प्रकल्प या भागात उभा राहिलेला नाही. अर्थात त्याअगोदरपासूनच आशिया खंडातील अन्नधान्य महामंडळाची सर्वात मोठी गोदामे मनमाड येथे आहेत. मालेगाव लोकसभा मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात निर्विवादपणे भाजपचा लोकप्रतिनिधी सातत्याने विजयी होत आहे.
विशेषतः डॉ. भारती पवार यांच्या रूपाने जिल्ह्याला केंद्रात पहिल्यांदा मंत्रिपद वाट्याला आले, त्यामुळे केंद्र स्तरावरील अनेक विषय मार्गी लागण्याची मोठी अपेक्षा होती. जिद्द व मनात ठरवले तर काय घडू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पानेवाडी इंधन प्रकल्प खरे तर हा प्रकल्प बारामतीला जाणार होता.
केंद्रात वजनदार नेते म्हणून शरद पवार यांचा दबदबा असूनही दिवंगत खासदार झेड. एम. कहांडोळे यांनी तत्कालिन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असण्याच्या काळात केंद्र स्तरावरील पेट्रोलियमचा हा प्रकल्प आपल्या मालेगाव लोकसभा मतदारसंघात खेचून आणला होता. त्याकाळात एक एक खासदार कमी पडू नये याची नरसिंहराव यांनी कशी काळजी घेतली हे स्पष्ट करण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे .
नांदगाव विधानसभा मतदारसंघात मनमाड व नांदगाव ही दोन महत्वाची स्थानके असूनही कोरोना काळाचे निमित्त झाले अन्‌ पूर्वी बहाल केलेल्या अनेक सुविधा काढून घेण्यात आल्या. पंचवटी एक्स्प्रेस असो की मनमाडहून सुटणाऱ्या अन्य गाड्या त्या भुसावळ, जालना, नांदेड, अमरावतीपर्यंत गेल्यात किंवा नेण्याचा प्रयत्न झाला. रेल्वे फाटक बंद करून निर्माण करण्यात आलेले सब वे त्याचा उघडा पडलेला दर्जा यामुळे असून नसल्याचा मनस्ताप अशी अवस्था या सबवे प्रकल्पांची झाली.
पावसाळा नसतानाही ज्याच्या साच्यातून मोठ्या प्रमाणात वाहणारे पाणी त्यातून साचलेल्या पाण्याचे डबके म्हणजे सबवेची भेट अशी कुचेष्टा आजही या कामांची होत आहे. रेल्वेशी निगडित विधानसभा मतदार संघ संलग्न असूनही रेल्वेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत फारसे हाती काही गवसत नाही असे आढळून आले आहे. या लोकसभा मतदार संघात मनमाडसारखे जंक्शन स्टेशन आहे.
या स्थानकावरून देशात सर्व ठिकाणाहून जाता येते मात्र काही महत्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना अद्यापही थांबा मिळत नाही या मागणीला रेल्वे प्रशासन दाद देत नाही. प्रवासी गाड्यांच्या थांब्यासाठी जन आंदोलने करावी लागतात. आर्थिक उत्पन्न मिळत नाही म्हणून तांत्रिकतेचा किस काढून त्याकडे कानाडोळा केला जातो.
भुसावळ मंडळात नांदगावसारखे महत्वाचे स्थानक व सोळा लाईनचे रेल्वे यार्ड व मुबलक जागा असूनही केवळ प्रशाकीय पातळीवरची अनास्था व राजकीय इच्छाशक्तीपायी नांदगावला वर्षानुवर्षे दुर्लक्षित केले गेले. मनमाड- इंदोर रेल्वे मार्गाचेही बाबतीत असेच घडले. हा रेल्वे मार्ग होणार म्हणू परिसरातील जनतेच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.
गेल्या पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धुळे-नरडाणा रेल्वे मार्ग जोडण्याच्या प्रकल्पाच्या कामाचा शिलान्यास झाला मात्र हा प्रकल्प अजूनही रखडत आहे. त्यामुळे मनमाड- इंदोर मार्ग अधांतरी लटकला आहे. केंद्र सरकार स्तरावर पायाभूत सुविधा अथवा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशी निगडित एखादा प्रकल्प होईल अशी आशा डॉ. भारती पवार यांच्या केंद्रातील मंत्री मंडळाच्या सहभागातून निर्माण झाली मात्र तसे घडू शकले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default