या प्रकरणी सदानंद व्यंकटी मुंडे (३४, तलाठी – सजा ममुराबाद) आणि अभिजित नामदेव येवले (३९, मंडळ अधिकारी – सजा म्हसावद) यांच्याविरोधात शनिपेठ पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसा उघड झाला प्रकार?
तक्रारदार हा वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतो.
४ फेब्रुवारी रोजी रात्रपाळीत गस्त घालत असताना तलाठी मुंडे यांनी वाळूने भरलेला डंपर पकडला. मात्र, काही वेळातच मंडळ अधिकारी येवले यांचा फोन आल्यानंतर तो डंपर सोडून देण्यात आला.
यानंतर “कारवाई न करण्याच्या बदल्यात” ५० हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ३० हजार रुपयांवर सौदा ठरला.
ACBचा सापळा आणि रंगेहाथ पकड
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ११ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे लेखी तक्रार दिली. पडताळणीत मागणी स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आला.
जुन्या जळगावमधील मंडळ अधिकारी येवले यांच्या खासगी कार्यालयात तलाठी मुंडे यांनी ३० हजार रुपये स्वीकारताच ACBच्या पथकाने धाड टाकत दोघांना पकडले.
झडतीत काय सापडलं?
तलाठी मुंडे यांच्या बॅगेत रोख ₹४०,२०० आणि एक मोबाईल
मंडळ अधिकारी येवले यांच्याकडे ₹७,६०० रोख व मोबाईल
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे व पथकाने यशस्वी केली.
जिल्ह्यात लाचखोरीचे सत्र सुरूच!
गेल्याच आठवड्यात पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव येथे उपकृषी अधिकाऱ्यालाही ५ हजारांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले होते.
या प्रकरणी लिलाधर शिवाजीराव देशमुख (उपकृषी अधिकारी, पिंपळगाव), तसेच खासगी पंटर संजय पाटील आणि नितीन निकम यांच्याविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.
शेतकऱ्याच्या अनुदानावर ‘कट’!
तक्रारदार शेतकऱ्याने कृषी अवजार खरेदीसाठी ऑनलाईन अर्ज केला होता. मंजुरीनंतर रोटाव्हेटर व नांगर खरेदी करूनही अनुदान मिळण्यासाठी आवश्यक छायाचित्र अपलोड न झाल्याने अडथळे निर्माण झाले.
या प्रक्रियेसाठीच ५ हजारांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
महसूल व कृषी विभागात धास्ती
सलग उघड होत असलेल्या लाचखोरीच्या कारवायांमुळे जिल्ह्यातील महसूल आणि कृषी विभागात भीतीचे वातावरण आहे. “वाळू माफिया आणि काही अधिकारी यांची सांठगाठ?” असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनीही आता लाचलुचपत विरोधात पुढे येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
पुढे काय?
दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास सुरू असून, आणखी कोणी यात सहभागी आहे का याचा शोध घेतला जात आहे.
जळगावमध्ये सुरू असलेल्या या कारवायांमुळे प्रशासनातील भ्रष्ट प्रवृत्तींना मोठा धक्का बसला असून, “लाच घेतल्याशिवाय काम होत नाही” ही मानसिकता मोडीत निघणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

