खासदार संभाजी राजेंचं उपोषण अखेर मागे, म्हणाले “माझ्या चेहऱ्यावर…”

फुले शाहू आंबेडकर
0

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर तिसऱ्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं. राज्य सरकारने त्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर संभाजीराजे यांनी हे उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं. यावेळी संभाजीराजेंनी मलाही काय होणार आहे हे माहिती नव्हतं. मात्र, आता माझ्याही चेहऱ्यावर हास्य आलं आहे, अशी भावना व्यक्त केली. तसेच राज्यातील सर्व मराठा संघटनांचे आभार मानले. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आझाद मैदानावर उपस्थित होते.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “माझ्या चेहऱ्यावर देखील आत्ता हास्य आलं. मी देखील फार खूश आहे. मलाही पुढे काय होणार आहे याची कल्पना नव्हती. मी इथं उपस्थित असलेल्या आणि इथं नसताना कायम पाठिंबा देणाऱ्या सर्व मराठा संघटनांचे आभार मानतो. हे सर्व मला २००७ पासून पाठिंबा देत आहेत. या सर्व संघटनांनी दाखवून दिलं की हा खऱ्या अर्थाने शाहूंचा वंशज आहे. राजे तुम्ही फक्त कोल्हापूरसाठी मर्यादित राहायचं नाही, तर महाराष्ट्र आणि देशापर्यंत शिवाजी महाराजांचं नाव नेण्याची तुमची जबाबदारी आहे असं या संघटनांनी सांगितलं.

“अनेक लोकांनी मी खासदार झाल्यावर टीका केली, पण माझी पूर्ण खासदारकी समाजासाठी आणि अनेक विकासाच्या कामांसाठी लावली. शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी लावली. इतिहासात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संसदेत कोणीही विषय मांडला नव्हता. मी संसदेत सुरुवात केली. त्यानंतर अनेक खासदारांनी त्यांचा अभ्यास नसला तरी त्यांच्या त्यांच्या परीने हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांचेही आभार,” असं संभाजीराजे यांनी सांगितलं.

“उपोषणाचा निर्णय घरी सांगण्याचं माझं धाडस झालं नाही”

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “आमरण उपोषण हा माझ्यासाठी ऐतिहासिक निर्णय होता. मी घरच्यांना विचारलं नाही. संयोगिताराजे आणि शहाजी यांना हा निर्णय सांगण्याचं माझं धाडस झालं नाही. त्यांनी बरोबर समन्वयकांकडून माहिती काढली. मी माझ्या वडिलांना छत्रपती शाहू महाराज आणि आईला देखील हा निर्णय सांगितला नाही. तुम्हाला पटणार नाही, पण आज तुम्हाला घरातली आतली गोष्ट सांगतो. ज्या दिवशी मी आमरण उपोषण करणार असं जाहीर केलं तेव्हा माझ्या वडिलांना फोन करण्याचंही माझं धाडस नव्हतं.”

वडील असल्याने त्यांनी मी चुकीचा निर्णय घेतला असंच म्हटले असते. म्हणून मी त्यांना सांगितलं नाही. मी त्यांच्याशी १०-१२ दिवस बोललो नाही. वडील असल्याने आदरयुक्त भीती असणारच, त्यामुळे अखेर आंदोलनाच्या दिवशी मी त्यांना फोन केला. तेव्हा त्यांनी मला माझ्या आशीर्वादाची काय गरज, तुम्हाला तर महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे असं म्हटलं,” असंही त्यांनी नमूद केलं.

“माझी पत्नी संयोगिताराजे यांनी माझ्यासोबत गनिमी कावा केला”

“माझी पत्नी संयोगिताराजे यांनी माझ्यासोबत गनिमी कावा केलाय. त्या दररोज दिवसभर थांबायच्या आणि नंतर झोपायला जायच्या. मी नकळत त्यांच्याकडून दररोज खाण्याची आणि फिट राहण्याची शपथ घेतली होती. मला म्हटल्या शपथ घ्यायची नाही. त्यांनी देखील माझ्यासोबत उपोषण केलं. त्यांनी देखील अन्नत्याग केला होता हे मलाही माहिती नव्हतं. त्यामुळे मी त्यांचे देखील आभार मानतो,” असंही संभाजीराजे यांनी म्हटलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default