कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; पंचक्रोशी हादरली!

फुले शाहू आंबेडकर
0
परभणी: बँकांचं कर्ज फेडता येत नसल्याच्या तणावातून परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथील एका ३९ वर्षीय शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गोपाळ रामराव चौधरी असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना सोमवार, २८ मार्च रोजी उघडकीस आली आहे.
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की जिंतूर तालुक्यातील बोरी येथील मयत शेतकरी गोपाळ चौधरी यांचे वडील रामराव चौधरी यांच्या नावे भारतीय स्टेट बँक शाखा बोरीचे ११ लाखांचे कर्ज आहे. तर, तुळजाभवानी अर्बन बँकेचे ५१ हजारांचे कर्ज स्वत: गोपाळ चौधरी यांच्या नावावर होते. गोपाळ चौधरी हे त्यांचे वडील व भाऊ यांच्या समवेत शेतीचे काम पाहत होते. बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे याची चिंता त्यांना लागून राहिली होती. गेल्या काही दिवसांपासून ते त्याच मानसिक तणावाखाली होते. त्यातूनच रविवार, २७ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गोपाळ चौधरी यांनी शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज समोर आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत शेतकरी गोपाळ चौधरी यांच्या पश्चात वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे बोरी व आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default