भुसावळहून आक्सा बीचवर, एकाच कुटुंबातील 12 जण समुद्रात बुडता-बुडता वाचलेAuthored

फुले शाहू आंबेडकर
0
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, ही म्हण जळगावहून आलेल्या एका कुटुंबाच्या बाबतीत तंतोतंत खंरी ठरली. कारण मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर फिरायला आलेल्या बारा जणांच्या कुटुंबाचा जीव थोडक्यात वाचला. मालाड परिसरात असलेल्या आक्सा बीचवर हे कुटुंबीय आले होते. समुद्राला आलेल्या भरतीच्या पाण्यामध्ये सगळे जण उतरले होते. मात्र अचानक पाण्याची पातळी वाढू लागल्यामुळे बाराही जण समुद्रात बुडण्याची भीती निर्माण झाली. सुदैवाने लाईफगार्ड्सनी वेळीच धाव घेतल्यामुळे हे भरलं गोकुळ सुखरुप राहिलं आहे.
नेमकं काय घडलं?

मुंबईतील मालाड परिसरात असलेल्या आक्सा बीचवर पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. फक्त शहरातीलच नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे पर्यटक इथे फिरायला येतात. समुद्राच्या लाटांसोबत खेळता खेळता अनेक जण भान हरपून जातात. असंच काहीसं घडलं जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातून आलेल्या कुटुंबाच्या बाबतीत. समुद्रात भिजायला उतरलेल्या या कुटुंबाला पाण्यात खेळण्याचा मोह आवरला नाही आणि सर्व जण आत शिरले. मात्र भरतीचं पाणी कधी वाढत गेलं, हे कोणाच्याही लक्षात आलं नाही, आणि होत्याचं नव्हतं होण्याची वेळ आली.
लाईफगार्ड्सनी बारा जणांना बुडताना पाहिलं

मुंबईच्या मालाड पश्चिम भागात असलेल्या आक्सा समुद्र चौपाटीवर आज (गुरुवारी) दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. भुसावळमधून फिरायला आलेल्या एका कुटुंबातील 12 जण समुद्राच्या भरतीमध्ये उतरल्यामुळे बुडत होते, मात्र आक्सा बीचवर तैनात जीवरक्षकांनी त्यांच्या प्राणाचे रक्षण केले.
मुंबई महानगरपालिकेचे लाईफ गार्ड भारत मानकर आणि त्यांच्या 6 जणांच्या टीमने समुद्राच्या भरतीमध्ये 12 जणांना बुडताना पाहिले. त्यानंतर त्यांनी लगेच समुद्रात उडी मारली आणि समुद्रामधून सर्व 12 जणांना सुखरुप बचाव करून बाहेर काढले आहेत. लाईफ गार्डनी केलेला या 12 जणांच्या सुटकेमुळे सर्व ठिकाणी त्यांचे कौतुक केले जात आहे. तर या कुटुंबाचाही जीव भांड्यात पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default