औरंगाबाद येथे दारु पिताना वादावादी एकाची चाकूने भोसकून हत्या दुसरा गंभीर

फुले शाहू आंबेडकर
0
औरंगाबाद : शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. मागील आठवड्यात चौदाशे रुपयांच्या वाटणीवरुन मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना घडली असताना आता पुन्हा दारु पिताना तिन मित्रांमध्ये झालेल्या वादातून एकाने दोन मित्रांना चाकूने भोसकल्याचा धक्कादायक प्रकार मध्यरात्री उघडकीस आला. यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. तर या दोघांना मारणाऱ्या संशयितास पोलीसांनी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. रिजवान उल हक इम्रान उल हक (३२) असे मृताचे, तर वसीम मुक्तार कुरैशी (२८) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. मोहसीन उर्फ हमला रमजानी कुरैशी (३०) असे ताब्यात घेतेलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील दललावाडी भागातील एका इमारतीचे बांधकाम अर्धवट राहिले आहे. सर्व बाजूंनी पत्रे लावून जागा बंद केली आहे. परंतु एका ठिकाणाहून आत जाण्यासाठी रस्ता आहे. त्यातून तीन जण मद्यपान करण्यासाठी गेले असता रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. या वादातून मोहसीन कुरैशी याने दोघांना चाकूने भोसकले. रिजवानच्या छातीवर, पायावर खोलवर वार करण्यात आल्याने तो जागीच ठार झाला. तर वसीम कुरैशी हा गंभीर जखमी आहे. त्याच्याही छातीवर वार केलेले आहेत. त्याच्या छातीतून आणि नाकातून रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, या दोघांना मारणारा मोहसीन घटनेनंतर पसार झाला, परंतु पोलिसांनी त्याला अटक केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दिपक गिऱ्हे, साहाय्यक आयुक्त विशाल ढुमे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्यासह पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default