अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाली होती. या केसमध्ये अहमदनगर प्रधान जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी या तिहेरी हत्याकांडातील आरोपींची सबळ पुराव्या अभावी मुक्तता केली आहे.
जवखेडे खालसा गावात २० ऑक्टोबर २०१४ रोजी जाधववस्ती येथील गवंडी काम करणारे संजय जाधव वय वर्ष ४५ त्यांची पत्नी जयश्री वय वर्ष ४० आणि एकुलता एक मुलगा सुनील जाधव वय १९ या तिघांची रात्री ९ च्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्याकांड झालेली वस्ती एकांती असून या वस्तीच्या आसपास घरे नाहीत. त्यामुळे ही हत्या करत असताना शेजाऱ्यांना कोणताही आवाज गेला नाही.
त्यामुळे, मारेकऱ्यांना पुरावे नष्ट करण्यासाठी रात्रभरात सर्व पुरावे नियोजनबद्ध पद्धतीने नष्ट केले होते. घराच्या ओट्यावर हे हत्याकांड झाले होते. हत्याकांडानंतर ज्या ठिकाणी रक्त सांडले होते. तेथे शेजारील शेत जमिनीतून माती आणून टाकली होती. तर मृतांचे कपडे घटनास्थळापासून जवळपास १५ किलोमीटर अंतरावर एका ओढ्याच्याकडेला जाळून नष्ट केली होती.
तसंच मयत संजय यांची दुचाकी देखील अंतरा अंतरावर उभी करण्यात आली होती. त्यामुळे शेजारी राहण्याऱ्या लोकांना जाधव कुटुंब बाहेर गावी गेले असल्याचं परिस्थिती मारेकऱ्यांकडून निर्माण करण्यात आली होती.
या प्रकरणी प्रशांत उर्फ काळू दिलीप जाधव यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव- पाटील यांनी काम पाहिले. आरोपींतर्फे विधिज्ञ सुनील मगरे, छगन गवई, नितीन मोने, सिध्दार्थ उबाळे, अरूण चांदणे यांनी काम पाहिलं.
दरम्यान, या हत्याकांडातील आरोपी प्रशांत उर्फ काळू दिलीप जाधव, अशोक दिलीप जाधव आणि दिलीप जगन्नाथ जाधव सर्व राहणार जवखेडे खालसा यांची सबळ पुराव्या अभावी मुक्तता करण्यात आली आहे. प्रधान जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी आज मंगळवारी सरकारी पक्ष आरोपींविरूद्ध आरोप सिध्द न करू शकल्याने या तिन्ही आरोपींची मुक्तता करण्यात येत असल्याचे जाहिर केले.