देवस्थान जमिन घोटाळे बहाद्दरांवर जिल्हा प्रशासन मेहेरबान? कारवाई करण्यास टाळाटाळ

फुले शाहू आंबेडकर
0

बीड - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देवस्थान आणि वक्फ बोर्डच्या जमिनी, काही पांढरपेशी राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताने भूमाफियांनी लाटल्या आहेत. अनेक ठिकाणी या जमिनीवर प्लाटिंग झालीय, तर अनेकांनी परस्पर जमीन विकली आहे. मात्र या जमिनी लाटणाऱ्या भूमाफियांना जेरबंद करण्याऐवजी त्यांना अभय देण्याचं काम, महसूल प्रशासनाकडून होत असून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

बीडच्या आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात हिंदू देवस्थान आणि वक्फ बोर्डच्या जमिनी काही व्यापाऱ्यांना हाताशी धरून, पांढरपेशी नेत्यांनी लाटल्या आहेत. याबाबत एसआयटीच्या तपासात देखील जमिनी लाटल्याचं निष्पन्न झाले आहे. यामुळं या भूमाफियांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी. यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नायब तहसीलदार अभय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मात्र नायब तहसीलदार जोशी यांनी कारवाई करण्यापेक्षा,"मी बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे, जर मी गुन्हे दाखल करून कारवाई केली, तर भविष्यात मला शारीरिक अथवा मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे माझी केलेली नियुक्ती रद्द करावी" असं निवेदन प्राधिकृत अधिकारी जोशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलं आहे.

तर याविषयी सामाजिक कार्यकर्त्यांनी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे म्हणाले, की आष्टी प्रकरणात घोटाळा झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर, एसआयटी मार्फत चौकशी करण्यात आली. त्यानंतर गुन्हे दाखल करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून अभय जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

मात्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. जर हे गुन्हे मी दाखल केले तर भविष्यात मला शारीरिक अथवा मानसिक त्रास होऊ शकतो, त्यामुळे माझी नियुक्ती रद्द करा. त्यामुळं एकंदरीत स्थानिक राजकीय पुढारी असो वा भूमाफिया असो, यांचा दबाव पाहता, ज्या देवस्थानाच्या जमिनीचा घोटाळा झाला आहे, त्या संदर्भात कारवाई करण्यासाठी, जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक या 2 पैकी एक वरिष्ठ अधिकारी प्राधिकृत म्हणून नेमावा आणि आष्टी तालुक्यातील देवस्थानाची जशी एसआयटी मार्फत चौकशी केली. तशीच जिल्ह्यातील इतर देवस्थानाच्या जमिनीची देखील चौकशी करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यात जवळपास 27 हजार एक्कर जमिनी, या हिंदू देवस्थान आणि वक्फ बोर्डच्या आहेत. मात्र यापैकी हजारो एकर जमिनी या पांढरपेशी राजकिय नेत्यांनी आणि भूमाफियांनी लाटल्या आहेत. मात्र या भुमाफियांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडून चालढकल होत असून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे या भूमाफियांना प्रशासनाचेच अभय असल्याच चित्र निर्माण झालं असून नागरिकात प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default