नाशिकमध्ये अनेक भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा देखील देण्यात आला आहे. याशिवाय धोक्याच्या ठिकाणी असलेल्यांनी तातडीने प्रशासनाशीसंपर्क करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असंही सांगण्यात आलं आहे. जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर झाल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाची संततधार सुरूच आहे. सुरगाणा तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. सलग होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नदी-नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. नार-पार, अंबिका, वाझडी, तान-मान, कावेरी पिंजाळ, दमणगंगा या नद्या तर धोक्याच्या पातळी जवळ पोहचल्या असून पाऊस असाच सुरू राहीला तर या नद्या धोक्याच्या पातळी ओलांडतील
दुसरीकडे पुराच्या पाण्यामुळे छोटे रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे पिंपळसोंड, खुंटविहीर, शिराळा, अळीवपाडा, उंबरवाडा, दोडीपाडा, म्हैसखडक, बोरचोंड, कुकुडमंडा, वाघाडी, आमदा, वांगण, वाजवड, उंबुरणे, मंनखेड आदी गावाचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
