नर्मदा काठावरील आठ ते दहा गावांना जोडणारा अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी येथील नदीवरील फरशीपूल पावसाळ्याच्या सुरुवातीस काही भाग वाहून गेला होता. सदर पूल आता पूर्णपणे कोसळला आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. अककलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या व डोंगराळ भागातील भगदरीचा महुफळी येथील फुलहार नदीवरील पूल तत्कालीन राज्यपाल तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दत्तक घेतलेल्या गावाचा आहे. अत्यंत कमी उंचीचा आणि निकृष्ट दर्जाचा बांधल्याने सदर पुलाची हे अवस्था झाली असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
सहा गाव पाड्यांची झाली गैरसोय
सध्या पाऊस बंद आहे. नदीला देखील फारसे पाणी नाही. असे असताना हा पूल कोसळला. यामुळे नर्मदा काठावरील मांडवा, कंजाला डेब्रामाळ, पलासखोब्रा, वेलखेडी मोजापाडा, उर्मिलापाडा या गावासह पाड्यांवरील नागरिकांना व वाहनधारकांना या पुलाअभावी गैरसोय झाली आहे. सातपुडा पर्वतरांगांमधून पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर येत असल्याने या ठिकाणी जास्त उंचीचा व चांगल्या दर्जाचा पूल बांधणे अपेक्षित असतानाही कमी उंचीच्या निकृष्ट दर्जाचे काम केल्याने आज नागरिकांवर ही वेळ आली आहे. याकडे आता प्रशासन कधी लक्ष देत हे बघणे उत्सुक्याचे ठरणार आहे.
