नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कुपोषणावरून सर्वपक्षीय सदस्यांनी व्यापक चर्चा करत बालविवाह थांबवून जिल्ह्याला लागलेला कुपोषणाचा डाग कमी करण्यासाठी प्रभावी पाऊल उचलण्याची गरज व्यक्त केली. काँग्रेसचे सुहास नाईक, राया मावची, प्रताप वसावे, भाजपकडुन ऐश्वर्या रावल, संगीता गावीत यांनी विविध योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित केली. कुपोषणाच्या कारणांवरील चर्चेत बालविवाह हे प्रमुख कारण असल्याची माहिती महिला बालविकास विभागाच्या सर्वेक्षणातून उघड झाली आहे.
१० हजार जणांनी पळून जावून केले लग्न
गेल्या अडीच वर्षात कोरोना काळात विवाह समारंभ बंद असतानाही पळून जाऊन लग्न केलेल्या आकडेवारीत ९ हजार ९८३ मुलींनी अठरा वर्षे पूर्ण नसतानाही पळून जाऊन संसार थाटल्याने या साऱ्यांची बालविवाहात नोंद झाली आहे. यातला गंभीर प्रकार म्हणजे २ हजार ३०५ मुली अठरा वर्षाच्या आतच गर्भवती होऊन मुलांच्या माता झाल्याचे उघड झाले आहे. बालविवाहाबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवूनही बालविवाह थांबत नसल्याने कुपोषणासारखी गंभीर परिस्थिती चिंताजनक ठरत आहे.
दहा कुपोषित बालके घेणार दत्तक
लग्न व मुलांना जन्म देण्यासाठी मुलींची शारीरिक वाढ झाली नसताना विवाह झाल्यास बालके देखील कुपोषित राहतात. त्यामुळे प्रशासन व राजकीय लोकांनी एकत्रित येत समाज जागृती करून काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी १० कुपोषित बालके दत्तक घेण्याचे तयारी दर्शवली असून नवापूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य यासाठी पुढाकार घेण्यासाठी सरसावले आहे.
