सर्पदंश झालेल्या महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू; मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी दिला नकार

फुले शाहू आंबेडकर
0
नंदुरबार : अतिदुर्गम अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील रहिवासी नीलिमा कुवरसिंग वळवी (वय २२) ही घरात विस्तव पेटवण्यासाठी शेणाच्या गौर्या घेण्यासाठी गेली. यावेळी विषारी सापाने दंश  केल्याने ती बेशुद्ध पडली. सदर महिलेला तात्काळ बेशुद्ध अवस्थेत मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु जवळपास दोन ते तीन तास उलटूनही मोलगी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने वेळेत उपचार न मिळाल्याने सदर महिलेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
सातपुड्यातील दुर्गम भागांत एकीकडे दळणवळणाची  सुविधा नसल्याने बांबूच्या झोळीतून रुग्णांना रुग्णालयात न्यावे लागते. तर दुसरीकडे वेळेवर दवाखान्यात पोहोचूनही उपचार मिळत नसल्याने रुग्णाला जीव गमावावा लागत असल्याचे चित्र आहे. यावर प्रशासन काय कारवाई करते तसेच दुर्गम भागातील रुग्णसेवा आता तरी सुधारेल का? असा प्रश्न कायम आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे सर्पदंश झालेल्या महिलेला १३ महिन्याचे लहान बाळ आहे. दवाखान्यात वेळेत पोहोचूनही उपचार न मिळाल्यामुळे महिलेला जीव गमवावा लागला आहे.

नातेवाईकांना ठिय्या

मोलगी ग्रामीण रुग्णालयात असे प्रकार वारंवार घडत असल्याने प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत रुग्णालयाच्या बाहेर नातेवाईकांनी ठिय्या मांडून आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवले होते. जोपर्यंत मोलगी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवेच्या सुधारणा होत नाही; तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा नातेवाईकांनी दिला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default