मागील महिन्यात झालेल्या अवकाळी व गारपिटीची जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. जिल्ह्यातील सुमारे 8 हजार 717 शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या महिन्याच्या आत मदत उपलब्ध करून दिली. या शेतकऱ्यांसाठी 6 कोटी 75 लाख 98 हजार एवढा निधी 10 एप्रिल, 2023 च्या शासन निर्णयान्वये मंजुरही केला आहे. सदर मदत बाधित शेतकऱ्यांना नव्याने विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्याची कार्यवाही चालू आहे.
या महिन्यातही गारपीट, वादळामुळे शेतपिकांचे, घरांचे व पशुधनाचे नुकसान झाले आहेत. या नुकसान झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला व प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयाला दक्षतेचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. ज्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल तिथे तहसिल, कृषि कार्यालयाचा प्रतिनिधी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
