त्यामुळे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी 14 जानेवारी ही तारीख मीच सुचवली होती. त्या दिवशी तीळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणून मकर सक्रांत साजरी केली जाते. नामांतराच्या लढयात दलित सवर्णामध्ये निर्माण झालेली दरी मिटावी आणि नामांतराचा विजय दिवस दरवर्षी 14 जानेवारीला तीळगुळाच्या गोडी सारखा बंधुभावाने हर्षोल्हासात साजरा व्हावा.
म्हणूनच 14 जानेवारी 1994 रोजी डाँ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाले. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले
मुंबई महानगर प्रतिष्ठाण तर्फे डाँ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनाच्या 30 व्या वर्धापनदिनानिमीत्त आयोजित जाहीर सभेत ना. रामदास आठवले बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामांतर लढा 16 वर्षे आंबेडकरी जनतेने लढविला.
या आंदोलनात भारतीय दलित पँथरने देशभर रान पेटविले होते. या नामांतर लढयात अनेक भिमसैनिक शहिद झाले. त्या सर्व ज्ञात अज्ञात शहिदांना ना.रामदास आठवले यांनी यावेळी विनम्र अभिवादन केले.
मराठवाड विद्यापीठाला डाँ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिलेच पाहिजे. नामांतर केले पाहिजे. या अटींवर आम्ही 1990 मध्ये कॉग्रेससोबत युती केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी मला कोणताही अनुभव नसताना मी कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतांना सिध्दार्थ होस्टेलमधुन थेट मंत्रीमंडळात घेत मला कॅबीनेट मंत्री केले होते.
शरद पवारांना मुख्यमंत्री करण्यात माझ्या रिपब्लिकन पक्षाचा मोठा वाटा होता याची कबुली शरद पवारांनीही अनेकदा दिली आहे. मी नामांतर व्हावे या अटींवर काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झालो होतो. मात्र नामांतर होण्यास वेळ लागत होता. त्यामुळे मी 26 जानेवारी 1994 च्या पूर्वी नामांतर करावे अन्यथा मी मंत्रीपदाचा राजीनामा देईल असा निर्वाणीचा इशारा देणारे पत्र मी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांना पाठविले होते.
त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी मला मराठवाडा विद्यापीठ नामांतर करण्याबाबत कोणत्या दिवशी करावे ही तारीख विचारली होती. त्यामुळे मी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात 14 तारखेला महत्व असल्याने 14 एप्रिल आणि 14 ऑक्टोंबर प्रमाणे नामांतर दिन ही साजरा व्हावा म्हणून 14 जानेवारी ही तारीख मी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांना सुचविली.
