सासरच्यांकडून पैशांचा तगादा, सतत छळ; कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल, २ चिमुकल्यांचाही अंत

फुले शाहू आंबेडकर
0
नाशिकमध्ये विवाहित महिलेने सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. विवाहितेने दोन मुलांसह आपल्या आपल्या आयुष्याचा शेवट केला.
नाशिक : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे विवाहितेने दोन मुलांसह आयुष्य संपवलं आहे. विवाहितेच्या नातेवाईकांनी घटनेस जबाबदार पती, सासू, दिर यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी येथील चंद्रकांत नारायण पुरकर यांची मुलगी अश्विनी सुदाम मुळाणे (वय ३१) हिचा विवाह २०१२ मध्ये खतवड ता. दिंडोरी येथील अर्जुन सुदाम मुळाणे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसापासूनच मृत अश्विनीचा माहेरून पैसे आणण्यासाठी छोट्या - मोठ्या कारणाने शारीरिक तसंच मानसिक छळ सुरू झाला.
पुरकर कुटुंबीयांनी वेळोवेळी रक्कम देत भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु नवरा अर्जुन सुदाम मळाणे, सासू हिराबाई, दिर प्रमोद यांनी वेळोवेळी विविध कारणांनी मीनाक्षीचा शारीरिक आणि मानसिक छळ करीत मारहाण करीत होते. त्यामुळे त्यांच्या जाचाला कंटाळून काल दुपारी (२६ एप्रिल) त्यांच्या शेततळ्यात मोठा मुलगा सिद्धेश अर्जुन मुळाणे (वय ९), लहान मुलगा विराज अर्जुन मुळाणे(वय ६) यांच्यासह उडी मारत आत्महत्या केली असल्याबाबत फिर्याद दिंडोरी पोलीस ठाण्यात दिली
पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. मध्यरात्री दोन मृतदेह पाण्यातून काढण्यात आले, तर एक मृतदेह आज सकाळी मिळाला. उत्तरीय तपासणीनंतर खतवड येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान घटना समजताच मृत मीनाक्षीच्या नातेवाईकांनी खतवड येथे धाव घेतली. यावेळी तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांची समजूत घालत तणाव दूर केला. कोणताही अनर्थ घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. नातेवाईकांनी ज्यांच्याकडून त्रास आहेत त्याची तक्रार केली आहे. मृत मीनाक्षीच्या माहेरच्या नातेवाईकांनी पोलिसात फिर्याय देत असताना केवळ ज्यांचेकडून त्रास होता त्यांचेबाबत फिर्याद दिली.
आत्महत्येच्या अनेक प्रकरणांमध्ये नणंद, नंदाई, जावा आदी कुटुंबातील सर्वांना प्रकरणात गोवतात तसेच घरापुढे अंत्यविधी करतात. मात्र पुरकर कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईकांनी समंजसपणा दाखवत ज्यांचा त्रास होता त्यांची तक्रार दिली. तसेच अंत्यविधीही कोणताही वाद न करता स्मशानभूमीत विधिवत केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default