धुळे जिल्हा रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव, घाणीचे साम्राज्य – रुग्ण त्रस्त, प्रशासन सुस्त

फुले शाहू आंबेडकर
0

धुळे, (मनोहर पाटील) १४ सप्टेंबर २०२५
धुळे जिल्हा रुग्णालय हे संपूर्ण जिल्ह्यातील एक प्रमुख व शासकीय वैद्यकीय केंद्र असतानाही सध्या तेथे अस्वच्छतेचे भयावह चित्र पाहायला मिळत आहे. रुग्णालयाच्या परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल सुरू आहेत. रुग्णालय प्रशासन मात्र याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचे चित्र समोर आले आहे.
 वॉर्डमधील अस्वच्छता – संसर्गजन्य आजारांना आमंत्रण
रुग्णालयाच्या विविध वॉर्डमध्ये झाडलोट व्यवस्थित न केली गेल्यामुळे जागोजागी कचरा, उघड्या ठिकाणी टाकलेले वापरलेले बॅन्डेज, सिरिंज, मास्क आढळून येत आहेत. बरेचशे टॉयलेट्स व स्नानगृहं अत्यंत दुर्गंधीयुक्त असून, ते वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत.
या घाणीतून माशा, झुरळे, उंदीर यांची वर्दळही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे आधीच आजारी असलेले रुग्ण आणखी त्रस्त होत आहेत. या घाणीमुळे टायफॉइड, डेंग्यू, स्किन इंफेक्शनसारख्या आजारांची शक्यता वाढली आहे.
 रुग्णांचे हाल, नातेवाईकही संतप्त
रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना केवळ त्यांच्या आजाराशीच नव्हे तर घाण, अस्वच्छता, दुर्गंधी, आणि मूलभूत सुविधांच्या अभावाशीही लढा द्यावा लागत आहे.
एक रुग्ण नातेवाईक सांगतात, "इतक्या मोठ्या शासकीय रुग्णालयातही जर अशी परिस्थिती असेल, तर सामान्य माणसाने कोणाकडे जायचं? रुग्णाच्या आजाराइतकीच चिंता आता इथे संसर्गाची होऊ लागली आहे."
 प्रशासनाकडून दुर्लक्ष
रुग्णालयाच्या स्वच्छता व्यवस्थेसाठी शासनाकडून मोठा निधी दिला जातो. मात्र, प्रत्यक्षात त्याचा उपयोग होत नसल्याचे चित्र दिसते. रुग्णालय प्रशासनाने यावर कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत.
सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याची तक्रार आहे, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून कामचुकारपणाचे प्रकारही घडत आहेत. वरिष्ठ अधिकारी या प्रश्नांकडे कानाडोळा करत आहेत.
 जनतेचा सवाल – जबाबदारी कोण घेणार?
स्वच्छ भारत अभियानाचा नारा देणाऱ्या शासनाची यंत्रणा स्वतःच स्वच्छतेच्या बाबतीत ढिली पडत असल्याने जनतेमध्ये संतापाची भावना आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, आणि जनतेने रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.
 प्रशासनाने घ्यावी तत्काळ दखल
या स्थितीवर तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. नियमित झाडलोट, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, शौचालयांची सफाई, आणि संसर्गजन्य कचऱ्याचे व्यवस्थित व्यवस्थापन यासाठी स्पष्ट आराखडा तयार करून त्वरित अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे.
धुळे जिल्हा रुग्णालय हे हजारो रुग्णांचे आशास्थान आहे. मात्र सध्या तेच रुग्णालय घाणीचे अड्डे बनले आहे. प्रशासनाने वेळेत पावले न उचलल्यास जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, आणि या अक्षम्य दुर्लक्षाची किंमत सामान्य माणसाच्या आरोग्याने भरावी लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default