पोलीस तपासानुसार, नाशिकमधील संदीप पाटील या तरुणाचं अपहरण झाल्यानंतर या महालुटीचा धागा उघडकीस आला. संदीप पाटील याने सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे केलेल्या खुलाशात अनेक धक्कादायक दावे केले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
संदीप पाटील याच्या म्हणण्यानुसार, 16 ऑक्टोबर 2025 रोजी कर्नाटकातील चोरला घाट परिसरात दोन कंटेनरमध्ये तब्बल 400 कोटी रुपये होते. हे पैसे गोव्यातून कर्नाटक मार्गे बालाजी ट्रस्टकडे पाठवले जात होते. चोरला घाटात पोहोचताच रात्रीच्या अंधारात या कंटेनरची लूट करण्यात आली. या कंटेनरमध्ये 2000 रुपयांच्या जुन्या नोटा असल्याचा दावा संदीपने केला आहे.
संदीपचा आणखी गंभीर आरोप असा की, या नोटांचा मूळ मालक ठाण्यातील किशोर सावळा नावाचा बिल्डर असून, ही रक्कम त्याचीच होती.
अपहरण, मारहाण आणि धमक्या
संदीप पाटील याने व्हिडीओमध्ये सांगितले की, 20 ऑक्टोबर 2025 रोजी जयश कदम नावाच्या व्यक्तीने व्हॉट्सॲपवरून फोन करून “तुझ्या नावाची तक्रार आली आहे, चौकशीसाठी उद्या घोटीला ये” असे सांगितले. दिवाळी असल्यामुळे तो 22 ऑक्टोबर रोजी घोटीला गेला, तेव्हा त्याला बळजबरीने फॉर्च्युनर गाडीत बसवण्यात आले.
या गाडीत विशाल नायडू आणि सुनील धुमाळ हे दोघे होते. त्यांनी संदीपला नाशिककडे नेत “तूच आमच्या शेटचा कंटेनर लुटलास, 100 कोटी कुठे आहेत?” असे म्हणत बेदम मारहाण केली, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि खंडणीची मागणी केल्याचा आरोप संदीपने केला आहे.
गुन्हा दाखल – तपास वेगात
या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिस ठाण्यात अपहरण, बेकायदेशीर डांबून ठेवणे, मारहाण, खंडणी, धमकी देणे आणि गंभीर आर्थिक गुन्ह्यांचे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काही संशयितांची नावे निष्पन्न केली असून, ठाणे–नाशिक–कर्नाटक असा तपासाचा पसारा वाढवण्यात आला आहे.
राजकीय–बिल्डर कनेक्शनचा संशय
या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर रोकड, जुने चलन आणि ट्रस्टचा उल्लेख असल्याने राजकीय आशीर्वाद आणि बिल्डर लॉबीचा सहभाग असल्याचा संशय बळावला आहे. तपास यंत्रणा आता मनी ट्रेल, कॉल डिटेल्स, कंटेनर हालचाली आणि संबंधित व्यक्तींचे आर्थिक व्यवहार तपासत आहेत.
पुढे काय?
संदीप पाटीलच्या व्हिडीओ खुलाशामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, 400 कोटींच्या लुटीमागचं खरे सूत्रधार कोण? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुढील तपासात आणखी मोठी नावे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
