मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री अचानक दुचाकी व चारचाकी वाहनांतून आलेल्या टोळीने गल्लीबोळांत दहशत माजवण्यास सुरुवात केली. कोणाशीही वाद नसताना घराबाहेर उभ्या असलेल्या नागरिकांवर त्यांनी कुऱ्हाड व कोयत्याने हल्ले केले. काहींना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टोळीने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करत दुकानांचे फलक फोडले, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवत पहाटेपर्यंत शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर विविध ठिकाणांहून १० जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यात एका युवतीचाही समावेश आहे. आरोपींकडून कुऱ्हाड, कोयते व इतर हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
या घटनेमुळे नाशिकमधील गुन्हेगारी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. काही दिवसांपूर्वी शहरात घडलेल्या हिंसक घटनांनंतरही टोळीगिरीचा उच्छाद सुरूच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “पोलीस बंदोबस्त असूनही अशा घटना घडत असतील तर सामान्य माणसाने सुरक्षिततेची अपेक्षा कशी करावी?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या टोळ्यांचे शहरात नेमके जाळे किती पसरले आहे, आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नाशिकमध्ये वाढत चाललेली टोळीगिरी थांबवण्यासाठी कठोर पावले उचलली जातात की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
