नाशिक | प्रतिनिधी
काचेच्या भिंतींमधील आलिशान कार्यालय, हातात लॅपटॉप, करिअरची स्वप्ने आणि आधुनिक जीवनशैली… पण या चकचकीत जगामागे एका तरुणीच्या आयुष्याभोवती कथितपणे विणला जात होता धर्मांतराचा आणि मानसिक नियंत्रणाचा काळाकुट्ट सापळा! बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेल्या २४ वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणात आता ‘एसआयटी’ने न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रातून अनेक थरारक आणि धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात २६ मार्च २०२६ रोजी दाखल गुन्ह्यात संशयित दानिश शेख (३२), तौसिफ अत्तार (३६) आणि निदा खान (२८) यांच्याविरुद्ध सबळ पुरावे जमा करण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. मात्र, या सर्व आरोपांची न्यायालयीन सुनावणी अद्याप बाकी असून संबंधित आरोपींना न्यायालयाकडून दोषी ठरविण्यात आलेले नाही, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
कॉलेजच्या गेटपासून सुरू झालं कथित प्रेमजाळं
तपासातील माहितीनुसार, पीडित तरुणी पदव्युत्तर शिक्षण घेत असताना संशयित दानिश तिच्या महाविद्यालयाबाहेर सातत्याने वावरत होता. पोलिसांच्या मते, याच काळात त्याने ओळख वाढवत प्रेमाचे जाळे विणण्यास सुरुवात केली.
दोघे एकाच महाविद्यालयात असल्याने संवाद वाढला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर “मोठ्या कंपनीत नोकरी” लावून देण्याचे आमिष दाखवत दानिशने तरुणीचा विश्वास संपादन केला. पुढे जुलै २०२२ मध्ये तिला स्वतः कार्यरत असलेल्या कंपनीत नोकरी मिळवून दिल्याचे तपासात नमूद आहे.
पण करिअरच्या नावाखाली सुरू झालेला हा प्रवास पुढे कथित मानसिक प्रभाव, नातेसंबंध आणि धर्मांतराच्या दिशेने वळत गेल्याचा दावा दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.
‘मॉडर्न’ मुलगी अचानक बदलली; कुटुंबीयांना लागला संशयाचा सुगावा
कुटुंबीयांच्या जबाबानुसार, जुलै २०२२ पर्यंत जीन्स-टॉप आणि आधुनिक जीवनशैली स्वीकारणारी तरुणी अचानक पूर्णपणे बदलू लागली.
तिने पंजाबी ड्रेस परिधान करण्यास सुरुवात केली. सलग दोन वर्षे एका विशिष्ट महिन्यात उपवास ठेवण्याचा प्रकार सुरू झाला. घरच्यांशी बोलताना ती स्वतःच्या धर्मापेक्षा संशयितांच्या धर्माबाबत अधिक बोलू लागल्याचेही तपासात नमूद आहे.
१५ मार्च रोजी कुटुंबीयांचा संशय अधिक बळावला. त्यांनी तिला विश्वासात घेत समुपदेशन केले. तब्बल दहा दिवसांच्या संवादानंतर अखेर २६ मार्च रोजी नातेवाईकांसह पीडिता पोलीस ठाण्यात पोहोचली आणि या संपूर्ण कथित कटाचा तपास सुरू झाला.
‘हानिया’ नावाने नवी ओळख?
तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, संशयितांनी पीडितेचे मूळ नाव बदलून तिला “हानिया” असे संबोधण्यास सुरुवात केली होती.
दोषारोपपत्रातील दाव्यानुसार, पीडितेच्या वर्तनात कथित बदल घडू लागल्यानंतर “ती योग्य मार्गावर आली” या भावनेतून हे नाव देण्यात आले. धार्मिक ओळख बदलण्याच्या उद्देशानेच हा नामकरणाचा भाग असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप, गूढ चॅटिंग आणि कथित कट्टरतेचे पुरावे
या प्रकरणात सर्वाधिक खळबळ उडवणारी बाब म्हणजे संशयितांच्या कथित व्हॉट्सअॅप चॅट्स!
तपासात पोलिसांनी काही संदेश जप्त केल्याचा दावा केला आहे. त्यामध्ये —
“आज हानिया का नंबर…”
“हानिया के साथ हूँ…”
“हानिया को आज दावत दी…”
अशा स्वरूपाचे संदेश आढळल्याचे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, या संदेशांमधून पीडितेवर प्रभाव टाकण्याचा आणि तिच्या मानसिकतेत बदल घडवण्याचा प्रयत्न दिसून येतो. काही संदेश डिलिट करण्यात आल्याचाही उल्लेख तपासात करण्यात आला आहे.
महागड्या वस्तू उकळल्याचा आरोप
दानिश शेख याने वेळोवेळी पीडितेकडून महागड्या वस्तू आणि आर्थिक लाभ घेतल्याचा आरोपही तपासात करण्यात आला आहे. पोलिसांनी काही वस्तू जप्त केल्याचेही सांगण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
न्यायालयीन प्रक्रिया सुरू; अंतिम सत्य कोर्टातच स्पष्ट होणार
या प्रकरणात एसआयटीने दोषारोपपत्र दाखल केले असले तरी अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच होणार आहे. आरोपींविरुद्धचे सर्व आरोप हे तपास यंत्रणांच्या नोंदींवर आधारित असून न्यायालयीन सुनावणीदरम्यान पुरावे आणि साक्षींची छाननी होणे बाकी आहे.
दरम्यान, या घटनेने “कॉर्पोरेट जगतातील भावनिक फसवणूक, मानसिक प्रभाव आणि वैयक्तिक स्वातंत्र्य” या मुद्द्यांवर नव्याने चर्चा सुरू केली आहे.

